Thursday, 5 November 2015

मन

मन सागरापरी खोल, त्याचा कोणा लागे थांग
मन भिरभिरे वाऱ्यावरी, त्याला धरू कसे सांग

मन मोकाट सुटता, त्याचा माग न लागता
त्याचे संगे धावू किती, न पाऊल थकता

मन सुटे सुटे झाले, अन डोहात दडले
किती शोधले तरी, न एक डोळा दिसले

मन हळुवार किती, थोडे शब्द तीर हे लागता
डोळ्यामध्ये मन उतरते, अश्रू हे दाटता

मन कणखर किती , सावटाची दाटे  भीती
सावरे स्वतःला लगेच, अन सावरे प्रीतीची हि  नाती

मन कधी किती गूढ , जणू कृष्ण माई संथ
मन सहिष्णू   धर्माचे , त्याला कोण पुसे त्याचा पंथ

मन एकाकी कधी अन  कधी सामावे सर्वांसी
रात्र काळोख दाटता,  उजळे प्रकाश चंद्रासी

मन  अवखळ  कधी,  अन कधी क्रोधात कोपता
मन प्रेमळ कधी , अन कधी निरव शांतता

न कळले हे मन , न माझे न तुझे
मन होता हे उदास, मानसी अश्रुंचे हे ओझे

कधी चंचल हे मन, अन कधी हर्षता आनंदे
कधी एकटे च रुसते अन कधी गाते तुझ्या संगे

कधी सापडेल का हे मन, माझ्या मुठीत या बंद
वाटे, नकोच सापडावे , मुक्त विहरू दे स्वच्छंद

जर कधी लागलच ठाव,  या उनाड मनाचा
उरे काय अर्थ  ह्या जगण्याचा

बरे आहे ,  हे असेच , काही कोडी न सुटतात
रिक्त ओंजळ हे माझी, न काही उरले उरात

मन कोणासी कळले , भले भले  हि थकले
जंग जंग पछाडून , हाती काही न लागले

मनाबद्दल हे विचार पण, माझ्या मनातलेच बोल
मानसी बोलता स्वतःच्या, कळे  मनाचे  हे मोल

नको उत्तर शोधूं या, या मनाच्या  प्रश्नाचे
तेच असेल हे जगण्याचे ऋण , जे बाकी असेल फेडायचे

-शीतल














No comments:

Post a Comment